सण साजरे करावेत तर कोरडवाहू किंवा हंगामी बागायती शेतकऱ्यांनीच. दावण असलेल्या बारमाही बागायतीवाल्यांच ते काम नाही. ते सदा कामावर पासले पडलेले. पाव्हणं आलं तरी त्यांच्याशी बोलायला टाईम नसतो.
मुळात पाव्हणं (घरचं काम चुकवून) पाव्हण्यांकडं येत्यात सणाची मजा लुटायला तर घास, मका कापण्यापासूनची कामं करावी लागत्यात. यामुळं बरेच पाव्हणे यायचे बंद झाले आमच्याकडं 
त्यामुळं मुलगी द्यायची तर पठारावर, कोरडवाहू भागात आणि सुन करायची तर बागायतातली असा रिवाज होता कैक पिढ्यांचा. आमच्या गावातल्या मुली प्रचंड कामदार, मान वर काढायला जागा नसती. असलच कशी...
सकाळी उठल्यापासून घरची कामं करायची, आई बापाला शेतात कामाला मदत करायची, जनावरांच्या खान्यापिण्याची कामं तर पोरापोरींच्याच जिवावर, संध्याकाळचा स्वयंपाकही, उरलेल्या वेळात शाळा आणि अभ्यास, जडीपाच्या कामाची सवय. यामुळं मुली शेती व घरसंसाराच्या सर्व बाबीत तरबेज. त्यामुळं सोयरेधायरे एकदम उडीवर. सुन करायची तर पारगावची करा.
पण लेक द्यायची तर... उलटं. दिली तर तिचं काय खरं नाय, पाठ टेकवायला टाईम भेटणार नाही, काम करू करू भुसकाट पडणार. त्यापेक्षा दुसरीकडं बघा. कृषी संस्कृतीतील या अशा अनेक भन्नाट गमती जमती आहेत. अनेक प्रथा परंपरा सहज जन्मतात रुढ होतात, जगणं सुसह्य करत जातात.
आता इथं विदर्भातली ही तान्ह्या पोळ्याची प्रथा, नागपूरकर भोसल्यांच्या काळात सुरू झाली, अतिशय संपन्नतेने मुलांमध्ये संस्काराची सुबोध पेरणी करत मस्त पैकी सुरू आहे. आज अनुभवली, फार फार संपन्न वाटलं. Thanks to Visora & Visorakar farmers.

छान लिहता.
ReplyDelete