Monday, January 1, 2018

महिला जिवनाची वेगळी बाजू - गडचिरोली

गडचिरोलीत एक गोष्ट पावलोपावली खुप प्रकर्षाने जाणवतेय, इथलं स्रीजिवन बंधमुक्त, जोखडमुक्त नितळ आहे. मुलींचा, महिलांचा एवढा सहज संचार, मुक्त फ्रँकनेस वावरणं मी आख्या भारतात (इशान्य सोडून) कुठं पाहिलेलं नाही.
परवा पोळ्याला इथल्या शेतकरी मित्रमंडळींच्या घरी होतो. आपल्याकडं संक्रातीला जसं तिळगुळ देवून पाया पडतात तसंच इथं पोळ्याला एकमेकाच्या कपाळी अक्षता लावतात व पाया पडून एकमेकांचे आशिर्वाद घेतात. त्यात भेद नाही. म्हणजे एकतर्फी कोणतीच बाब नाही. स्री ने पुरूषाच्या कपाळी अक्षता लावल्यानंतर पुरुष मग तो कुणीही असो, तो पण समोरच्या स्री च्या कपाळी अक्षता लावतो. अतिशय नितळ व सहजभाव आचरण.
लग्नात बायकोच्या कपाळी कुंकू लावण्याचा प्रसंग सोडला तर मी आयुष्यात कधी कोणत्याही स्रीच्या कपाळी स्पर्ष / औक्षण वगैरे केलेलं नाही. अगदी बहिणींनी राखी पौर्णिमा किंवा भाऊबिजेला ओवाळलं, डोई अक्षता टाकल्या तरी आपण बहिनींना औक्षण करत नाही किंवा अक्षता लावत नाही. बाकी कोणत्याही स्रीची अगदी औक्षणाचीही कल्पनाही करणे दूर. त्यामुळं इथं मी पार गोंधळून गेलो.
पहिल्या जेष्ठ वहिनी आल्या, माझ्या कपाळी अक्षता लावल्या क्षणभर त्यांनी मी अक्षता लावायची वाट पाहिली आणि माझा ढिम्मपणा पाहून थोड्या खजिल चेहऱ्यानं पाया पडायला वाकल्या. त्या माझ्याहून मोठ्या, मी मागे सरकलो आणि त्यांच्या पाया पडलो, लांबून दोघांचंही एकमेकाच्या पाया पडलं गेलं.
झालं दुसऱ्या वहिनी आल्या. आता मी बाकी मित्रमंडळींकडं बारकाईनं पाहू लागलो. ते सर्वच एकमेकांना औक्षण करत होते, कपाळी अक्षता लावत होते. आता मला माझी चुक कळली. मी काही एलियन नाही राव, तसं वागून कसं चालेल. मग मी ही त्यांना औक्षण केलं. नँचरली तराजूची दोन्ही परड्या टांगलेली आडवी पट्टी (काहीतरी शब्द आहे तिला, आत्ता विसरलो) क्षितिजसमांतर व्हावी तसं वाटलं.
सहा वर्षांच्या आतील दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या (बाल बालिका लिंग गुणोत्तर) गडचिरोलीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. (रत्नागिरीत स्री पुरुष गुणोत्तर सर्वाधिक दिसत असले तरी त्याचे कारण पुरुषी मंडळी बायकांना घरी ठेवून मुंबईत कामधामाला जाण्यात आहे, स्रीजन्मात नाही.) सो कॉल्ड पुढारलेल्या, पुरोगामी व सुधारणावादी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांपेक्षा १०० हून अधिक आहे. स्रीला माणूस म्हणून समानतेचा दर्जा असल्याशिवाय हे होऊ शकतं का ?
एक महत्वाची गोष्ट अशी की हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. असे लोक की जे जाती धर्माच्या बेगडी चौकटीबाहेर राहीले, अनेकांनी त्यांच्यावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केलाही पण त्यांनी आपले सत्व व नैसर्गिक सात्विक परंपरा कायम राखली. या परंपरेत स्री स्थान मानाचं आहे. हिंदू, मुस्लिम किंवा तत्सम धर्म व त्याअंतर्गत जातीपातींसारखं तिला वेगवेगळ्या गोष्टींत बांधून दडपून ठेवणारं नाही. आणि स्री मुक्त असूनही स्वैराचार नाही, हे सर्व सनातनी धर्ममार्तंडांच्या डोळ्यात झणझणित अंजन घालणारं सत्य. 
वरचा मुद्दा सेम टू सेम लागू पडतो महाराष्ट्रातील सर्वच आदिवासीबहुल भागाला. मग तो नंदुरबार असो किंवा आमचा जुन्नर-आंबेगाव-खेड चा पश्चिम पट्टा. स्रियांच कौटुंबिक स्थान डावं उजवं असलं, मानसातल्या श्वापदांची ती अनेकदा शिकार होत असली तरी तिचं स्थान मानाचं आहे. समानतेचं, सहजतेचं, मोकळीकतेचं आहे. डुज अँन्ड डोन्ट्स च्या पलिकडचं आहे, हे विशेष.

No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...