Monday, January 1, 2018

नगरधन किल्ला

नगरधन. वाकाटक साम्राज्याची राजधानी. एक असं साम्राज्य की जे अरबी समुद्रापासून सातपुड्यापर्यंत आणि नर्मदेपासून भिमा खोऱ्यापर्यंत उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्यप्रदेशात पसरले होते. एक असं साम्राज्य ज्यांने सलग २५० वर्षे या सर्व भागाच्या सर्वांगिन प्रगतिची बिजं रोवली व यशस्वीपणे फोपावलीही. एक असं साम्राज्य की ज्याच्या सोयरीकी थेट चंद्रगुप्त मौर्यांपर्यंत होत्या आणि जिथं एका महिलेने सलग २० वर्षे यशस्वी राज्यकारभार केला, तिच्या लोपमुद्रा आजही सापडतात इथल्या उत्खननात.
गुगल सर्च ला भरपूर काही सापडतं वाकाटकांविषयी. पुरातत्व विभागानं इथं खोदकाम केलंय. त्यातही सापडलंय भरपूर काही... प्राचिन संस्कृती, तत्कालिन माणसांच जगणं स्पष्ट करणारं, इतिहासाची हरवलेली पानं सापडताहेत, जे सापडतंय त्यातून अनेक गोष्टी जुन्या समजांना, आत्तापर्यंतच्या गृहीतकांना फाट्यावर मारून नवीनच काही गोष्टी सांगू पाहताहेत...असंही बरच काही आहे.
पुराणातील वांगी पुराणात ठेवून तत्कालिन शेती व शेतकऱ्यांची अवस्था काय होती, हे समजू पाहतो तेव्हा इथं माझ्या हाती धतूरा येतो. कुणाच्या हाती काही असेल तर कळवावं.
या किल्ल्यात व भोवती बरंच उत्खनन झालंय, सुरू असतं त्या त्या वेळी बरच काही. भातखाचरं, तुर आन् पडकाच्या रानात सापडलंयही बरंच काही. उत्खननाच्या खड्ड्यात लागलेलं पाणी पाहून रानमालक शंकररावांना थोडी उभारी आलीय, पावसानं भात घालवलाय त्यांचा आणि उत्खननाच्या खड्ड्याची विहिर करून पाणी उपसायची सोय कशी करायची या इचारानं त्यांच्या डोक्याचा गोयंदा झालाय.
सध्या वाकाटकांच्या या राजधानीत शेतकऱ्यांची अवस्था फारशी चांगली नाही, कालिदासाच्या यक्षाला खुणावणारे मेघ शेतकऱ्यांना मात्र वाकुल्या दाखवताहेत, अपुऱ्या पावसामुळं काही रानं पडीक पडलीत, भात खुरटल्यासारखा आहे, तूर नाही पेक्षा ठिक आहे. नापेर क्षेत्रात चना बुना करायच्या इचारात बांधाची गवत कापताहेत मंडळी, त्याला मात्र मरान नाही आणि ब्रोकर मंडळी घिरट्या हालताहेत डांबरी डांबरीनं.
रामटेकवरील लिखान खरं मानलं... खरं मानलं की बळीवंशातील हिरण्यकश्यपूचा वध इथं झाला, म्हणजे वाकाटक वगैरेंच्या आधी कधी तरी इथं बळीराजाच्या राज्याचाही केंद्रबिंदु असावा. असं असेल तर... आणि बळीनंतर वाकाटकांनी राज्य केलं असेल आणि त्यामुळे भरभराटही झाली असेल अगदी अजंठा वेरुळचीही... तरी मग इथले शेतकरी इडा पिडा टळो, वाकाटकांचे राज्य येवो असं का म्हणत नाहीत कोण जाणे.







No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...