Tuesday, January 9, 2018

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी


काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गाडीच्या पुढच्या बाजूला स्कुटीवर दोन मुली थांबलेल्या. त्यांच्या पाठीमागे अजून दोन स्कुटी व त्यावरही मुली डबलसीट. माझ्या उजव्या बाजूला दुभाजकावर दोन मुलं हातात फुगे घेवून उभी होती विकायला. 

या दोन पोरांतलं मोठं पोरगं आठवी नववीच्या वयाचं असेल... एक दर्द भरं गाणं म्हणत होतं दुसऱ्याला खिजवत खिजवत. दर्द से अपना रिश्ता तो पुराना है... त्यामुळे गाणं ओळखीच नसलं तरी आवाजातली कशीश भारी वाटत होती. एमपी युपी स्टाईलनं त्याचं आपलं चाललं होतं. तेवढ्यात मोठ्या पोऱ्याच्या लक्षात आलं सिग्नल लागलेला आणि त्यानं आपला मोर्चा थांबलेल्या लोकांकडे वळवला आणि माझ्या कारच्या पुढून मुलींकडे गेला.

चौकातलं मार्केटिंग हा सर्वच मेट्रो शहरांतला मोठा विषय. चौकाचौकात काही ना काही वस्तु विकल्या जातात सिग्नल लागल्यावर. कधी दयेनं, कधी कौतुकानं, कधी भिक मागण्यापेक्षा ही लोकं काहीतरी काम करताहेत या समाधानानं, कधी कनवेनं, कधी आवड तर कधी गरज म्हणून या वस्तू विकत घेतल्या जातात मोठ्या प्रमाणात. यातून सिग्नल मार्केटिंगचं मोठं विश्व उभं राहीलंय, जगात कुठंच मिळणार नाहीत अशा अनेक वस्तू सिग्नलला विकत मिळतात म्हणून माझं अनेकदा हे ह्युमन बिहेविअर स्टडीचं ठिकाण चालू चालूतलं. त्यामुळं माझं या दोन्ही पोरांवर बारिक लक्ष होतं.

मॅडम लो ना... लोना म्हणत ते पोरगं फुग्याची दोरी बांधलेली स्ट्रॉ पेक्षा मोठी प्लॅस्टिकची नळी सरळ त्या स्कुटी चालवणाऱ्या मुलीच्या छातीला टोचत होतं. आत्तापर्यंत त्या पोरांकडं सहानभुतीनं, त्याच्या आवाजातल्या दर्दी कशिशीनं मुलांविषयी मनावर साय जमा झाली होती. माझीच नजर तर दुषित नाही ना असंही वाटलं क्षणभर... पण तेवढ्यात त्या मुलीनं त्या पोऱ्याकडे अतिशय रागाने पाहत ती फुग्याची नळी हातानं झिरकाडली तसा माझ्या तळपायाची आग मस्तकात पोचली. साला ये तो साप निकला... सिग्नल सुटण्याच्या बेतात होता आणि माझ्या विरुद्ध बाजूला हे सुरु होतं. त्या मुलीने झिरकडल्यावर हा त्या पाठीमागच्या मुलींकडे गेला.

या वेळी त्याचा तो स्ट्रॉ जरा बाजूला होता हवेत. तशाही अवस्थेत पहिल्या मुलीला चुकून लागला असेल तो स्ट्रॉ... आपलाच गैरसमज झाला असेल असा विचार मनाला चाटत होता... तोच तो पोरगा पुन्हा आपल्या औकादीवर आलाच. त्यानं अतिशय झटकन तो स्ट्रॉ त्या मुलीच्या हॅडल धरलेल्या हाताच्या घालच्या बाजूने सरकवून पुन्हा तिच्या छातीला टोचायला सुरवात केली... मॅडम लो ना... लो ना... आता मात्र टाळकं सटकायची वेळ आलेली.. तिनंही झरकाडलं आणि तेवढ्यात सिग्नल सुटला... हा गडी पुन्हा मागं फिरला... या वेळी त्याच्या बत्तीशीत छद्मी हास्य होतं. क्षणभर वाटलं गाडी अशीच बाजूला घ्यावी आणि त्याच्या श्रीमुखात चार भडकावून द्याव्यात खणाखन... पण वेळ कुणाला होता. ना त्या मुलींना.. ना मला...

काही क्षणांचा प्रसंग, कोणी झिरकाडून निघून जातं, कुणी माझ्यासारखं पाहून हात चोळीत धुमसत निघून जातं. आपल्या लेखी वेळ टळलेली असते. पण तुमच्या आमच्या या वागण्यातून नकळत अशा वखवखलेल्या गिधाडांना पुढचं सावज शोधण्याचं आणि नवा खेळ खेळण्याचं बळ मिळत राहतं. मग ठिकाण नागपूरचा हा सेंट्रल चौक असेल मुंबईतलं एखाद्या वर्तमानपत्राचं ऑफिस असेल किंवा दिल्लीतला एखादा अंधारा कोपरा. आता सहन करणं खरंच बास झालं राव. जिथल्या तिथे हिशेब चुकता करायलाच हवा. विषवृक्ष पोसण्याआधीच त्याच्या मुळ्या छाटलेल्या बऱ्या...




Monday, January 8, 2018

लाल मिरची भिवापुरची




भावांनो... नाद नाय करायचा... कसा लाल जळजळीत ठसका आहे की नाही. पण टेन्शन नॉट. ही मिरची दिसायला जेवढी जहाल आहे तेवढी झणझणीत तिखट नाही. तुम्ही विदर्भात आलात आणि भिवापुरची मिरची चाखली नाही किंवा इथल्या मिरचीच्या खळ्यांचा फिल घेलता नाही तर काय पाहिलंत साला. मी बऱ्याच दिवसांपासून नजर ठेवून होतो, काल मनसोक्त खळी पालथी घातली आणि आस्वादही घेतला.

धुळे व नंदुरबारलाही मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पण भिवापुरच्या वावरंच्या वावरं किंवा खाचरंच्या खाचरं पसरलेल्या मिरचीच्या खळ्यांची व ढिगांची सर त्यांना नाही. खळी पाहून भिवापूर स्टॅडवर जायचं आणि खास भिवापूरी भजी चा आस्वाद घ्यायचा अर्थात जोडीला तळलेली भिवापूरी हिरवीगार मिरची. पाहून धडकी भरते मात्र पेरंभराचा घास घेवूनही जिभेला झणझन करत नाही. आणि मग तुम्ही वाह वाह करत अनोखी चव चाखत राहत... बघा संधी मिळाली किंवा मिळवता आली तर आस्वाद घेवून पहाच...

विदर्भातील ठेचा सर्वदूर प्रसिद्ध आहे. या ठेच्यातील महत्वाचा घटक म्हणजे भिवापूरची लाल मिरची. नागपूरच्या दक्षिणेला 60 किलोमिटरवर भिवापूर हे तालुक्याचं ठिकाण आहे. इथल्या मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला असलेला लाल भडक रंग आणि न झोंबणारा तिखटपणा. “स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया” च्या अभ्यासानुसार या मिरचीचा तिखटपणा भारतातील इतर महत्त्वाच्या तिखट मिरच्यांपेक्षा कमी आहे. तिच्या याच वैशिष्ट्यामुळे तिला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळालेला आहे.

मिरचीमध्ये कॅपसेसिनॉइड्स हे रसायन जितक्या अधिक प्रमाणात तितका त्यातील तिखटपणा अधिक असतो. या मिरचीचा रंग जास्त लाल आहे. या रंगाचे प्रमाण किंवा निकष निश्चित करण्यासाठी अमेरिकन रंगशास्त्र प्रणालीचा वापर केला गेला. याला आस्ता व्हॅल्यू असे म्हणतात. (ASTA American Spice Trade Association). तिखटपणा कमी असल्याने जास्त खावूनही ‘ॲसिडिटी’ होत नाही. दिसायला लाल भडक पण तिखटाला कमी अशा गुणधर्मांमुळे या मिरचीला परदेशातून मोठी मागणी आहे. रंगाच्या आणि तिखट पणाच्या बाबतीत गुंटूर, ब्याडगी या मिरच्यांच्या वाणांपेक्षा भिवापूर मिरची सरस ठरते. भिवापूर मिरची पावडरला किडी- रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने ती एक वर्षापर्यंत साठवताही येते.


ही मिरची पक्व होण्यास इतर मिरच्यांपेक्षा ३० ते ४० दिवस जास्त घेते. त्यात जोडीला मजुरांची कमतरता, मिरचीच्या शेतात किंवा खळ्यावर दिवसभर ठसकत काम करणे म्हणजे मजुरांसाठी अवघडच. तिखट कमी आहे म्हणून ती ठसका द्यायला थोडीच विसरते. त्यात बदलते हवामान, घटता पाऊस आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे  इथल्या शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या अन्य पिकांकडे धाव घेतल्याने ऐकेकाळी देश परदेशात अधिराज्य गाजवणाऱ्या भिवापूर मिरचीला उतरती कळा लागली होती. गेल्या काही वर्षात नामशेष होण्याच्या मार्गावर पोचलेल्या भिवापूर मिरचीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे.


भिवापूरचे प्रगतिशील शेतकरी डॉ. नारायण लांबट, अन्य शेतकरी, कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेतील अधिकारी श्रीमती नलिनी भोयर यांनी भिवापूर मिरचीला भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. त्यांना त्यासाठी या विषयातील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांची मदत झाली. विविध वैशिष्ट्यपूर्णी बाबींचे मुल्यांकन केल्यानंतर भिवापूरच्या मिरचीला जीआय प्राप्त झाला असून त्यामुळे या मिरचीच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब होवून हक्काची बाजारपेठ विकसित होण्यास मदत झाली आहे. कृषी विभाग व शेतकरी गटांच्या प्रयत्नामुळे मिरचीचे क्षेत्र 500 हेक्टरपर्यंत वाढले आहे.

भिवापूर तालुक्यातील जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असून, तेथील जमीन सूक्ष्म मूलद्रव्यांनी समृद्ध आहे. इथल्या मातीमध्ये लोह, मंगल व तांबे यांची उपलब्धता जास्त असल्याने मिरचीला अधिक लाल रंग प्राप्त होतो. मिरचीसाठी उष्ण, आर्द्र वातावरणाची व स्वच्च सूर्यप्रकाशाची गरज असते. भिवापूर तालुक्यात असेच वातावरण आहे. या भागात १२५० ते १३५० मी.मी. पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामात मिरचीला मुबलक पाणी मिळते. या वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीतून इथल्या मिरचीत विशेष गुणधारणा झाली आहे.


Monday, January 1, 2018

जिजाऊ सृ्ष्टी - सिंदखेडराजा, बुलडाणा

शतकं उलटली तिची पावलं तिथं उमटून... अजूनही ती जागा, लखोजीराव जाधवांचा तो वाडा, ते गाव, तो परिसर तिच्या अस्तित्वानं भारलेलं आहे. तिची पावलं स्वातंत्र्याची पावलं ठरली. ती चालत गेली विदर्भापासून कोकणापर्यंत आणि ही अवघी भूमी गोतावळ्यासह पिढ्यानपिढ्यांच्या दास्यातून मुक्त झाली.
तिनं एक शिवाजी घडवला, घराघरात शिवाजी घडला. महाराष्ट्र देश उभा राहीला. ती स्वराज्याचं खत, पाणी झाली. दोन छत्रपती, लोककल्याणकारी सम्राट तिने एकहाती घडवले. तिच्या एका समर्पित आयुष्यानं अगणित आयुष्य सार्थकी लागली. खरीखुरी स्वातंत्र्यदेवता, राजमाता जिजाऊंची पायधुळ कपाळी लागली आणि सार्थक झालं.





लोणार सरोवर - बुलडाणा


लोणार सरोवर, प्रति खजुराहो मंदीरसमुह आणि सुप्रसिद्ध विहीर... सकाळ सकाळ नाष्त्याला अजून काय पाहिजे. भुगोलाच्या पुस्तकाची अनुभुती जगताना मजा येतेय. लोणार चं पहिलं दर्शन उर न् डोळे भरवणारं होतं. मंदिरानं खजुराहोचा पुनर्प्रत्येयाचा आनंद दिला तर विहिरीनं आत आत आत आत्म्याच्या डोहाचा ठाव...

कितीतरी वेळ बसून होतो तिथल्या विरव शांततेत मीच माझ्यात हरवलेला. सरोवराच्या काठावर बाभळीच्या सावलीखाली बसून त्याच्यावर नजर खिळवून ध्यानस्त होण्याचा मोह ओमकारावर भागवला.

रात्री ढग नसते तर मस्त टिप्पूर चांदणं पडलेलं लोणार पहायला भेटलं असतं... परातीत चंद्र बघतात तसं. इथं घमेलं रेडी आहे, त्यात खारं पाणी भरलेलं आहे, देरी आहे अवकाश चंद्र चांदण्यांनी भरण्याचं आणि त्याचं प्रतिबिंब सरोवरातून परावर्तित होण्याचं... कानावर मोरांचे गायन, डोळ्यांत सरोवराचा पँनोरमा व्हू आणि आख्खी बुब्बुळं खारावलेल्या चांदण्यांनी भिजलेली...

बरंच काही राहीलंय, बरंच काही निसटलंय ओंजळीतून मनाच्या बोटांच्या फटीतून नकळत कवडशासारखं... पुढच्या वेळेसाठी !





कारंजा लाड - वाशिम


29 जुलै 2017
कारंजा (लाड). स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी इथल्या नवाबाला, या गावाला दोन वेळा लुटलेलं. कधी हिंदु, कधी मुस्लिम तर कधी जैन धर्मीयांच्या धर्मसशक्तीकरणाचे केंद्रबिंदु राहीलेले चार वेशींचे तीन तलावांमध्ये वसलेले वाशिम जिल्ह्यातील टुमदार गाव. कारंजा काळविट अभयारण्य त्याच्या लौकिकात आणखी भर घालतंय.
बराच फिरलो उभा आडवा, पण काळविट काही दिसलं नाही... आता सगळीकडंच गवत वाढलंय त्यामुळं त्याला १० वाटा मोकळ्या, आणि त्यातूनही ते काही देव नाही, भाविकांसाठी एका जागी बसून रहायला. रूषी तलाव मस्त आहे. आणि त्याच्या काठावरचं मंदीरही. एरवी म्हटलो असतो... जास्त लाडात यायचं काम नाही. पण आता लाडात (कारंजा) यायला हरकत नाही... 




शिंगणापूरचा देश, वेश अन् भेश - अमरावती


देश बदलला (आपल्याकडं देश = जिल्हा) की फक्त वेश न् भेश नाही बदलत, खाण्यापासून कामापर्यंत सगळंच बदलतं मल्टिडायमेन्शनली.
वाशिममधून अमरावतीत आलो शिंगणापुरला. गाडी एका हॉटेलपुढं लावली, हॉटेल गार होतं. म्हणून पुढच्या गरम हॉटेलात गेलो. मनात सारखी शंका कणकणत होती, गाडी सेफ राहील ना...
गरम हॉटेलच्या मालक कम आचारी कम वेटर कम सफाई कर्मचाऱ्याला तरी विचारलंच.. गाडी सेफ राहील ना. तो काही होणार नाही म्हणाला आणि मी बिनधास्त पाण्यावर ताव मारला. इथं प्रत्येक डिशसोबत कढी मिळते. आमच्या मंचरचा कढीवडा फेमस आहे. पण इथं... कढीवडा, कढीपँटिस, कढीभजी सगळं कढीमय.
खाद्ययात्रा आटोपून बाहेर आलो तर बुटेचं पुढचं चाक जागी बसलेलं. असं कसं होऊ शकतं लगेच ? आता तर टंच होती... मग त्या हॉटेलवाल्याला विचारलं, हवा गेल्याचा आवाज आला काय... तो नाही म्हणाला. मग बाजूच्या हॉस्पिटलमध्ये अँडमिट केली. गँरेजमध्ये डॉक्टर भेटला तो ही असा इब्लिस... चाक न खोलता पंक्चर काढणारा. काढली गड्यानं पंक्चर. टायरात काहीच नाही सापडलं... गप ४० रू दिले नं मांड ठोकली.
(29 जुलै 2017)





पृथ्वीच्या गर्भापर्यंत


पृथ्वीच्या गर्भापर्यंत गेलेला रस्ता... त्यावरून अप टू इनफिनिटी डुगडुगत जाणारी बुलेट. कानावर रुमाल, डोळ्यावर गॉगल, पावसापाण्याचं जँकेट आणि बुलेटशी वेवलेंथ जुळलेलं पॉझिटिव्ह माईंड... पाठीवरल्या ट्रेकिंग सँगमध्ये आख्खं ब्रम्हांड.
- - - -
जालना ते बुलडाणा जिल्ह्यातील रात्री चा प्रवास लाजिरवाना होता. अंधार पडायला लागला की टमरेल / चिंपाट / डबडं घेवून स्रियांची रस्त्याच्या कडेला शौच्चास बसायची लगबग. अंधार वाढत जाईल तशी गावशिवारांच्या आसपास ही परिस्थिती वाढत जाते. मग बुलेटच्या एक्स्ट्रा हेवी लाईटची माझी मलाच लाज वाटायची. त्या बसलेल्या असायच्या सराईतपणे तशाच... मलाच लाईट बंद करून गाडी चालवावी वाटायची इनफिनिटीपर्यंत...
लोणारमध्ये भर दिवसा कडाक्याच्या उन्हात गल्लीबोळातून फिरताना तर हे चित्र अधिकच बिकट, बाया घरातली चिल्लीपिल्ली रस्त्याकडंला आखरवायला घेवून आलेल्या. हागत्या पोराकडं जरा दुर्लक्ष करून मला वाटं लावायच्या आणि मग निवांत पिलावळ सांभाळायच्या... हे खरंच थोर आहे.
- - - -
किनगाव राजा च्या पुढून लोणार ला जायला दोन रस्ते आहेत. एक लिंगा मार्गे शॉर्टकट व दुसरा सुलतानपूर मार्गे बराच लांबचा ववंडा... अंधार पडल्यावर प्रत्येकजण आतल्या रस्त्यानं जावू नका, सुलतानपूरहून जा असं आग्रही सांगू लागला. अगदी माझा लोणारमधील दोस्ताचंही तेच पालूपद... एक जण म्हणाला बुलेट आहे म्हणल्यावर कोण काय करत नाय, आवाजानंच बाजूला पळत्याल. मला उलगडा झाला नाही, पण ती वेळही नव्हती गुंता सोडवायची. सुलतानपूर जिंदाबाद.
- - - -
लोकांना अज्ञान प्रकट करायची खुप घाई असते. ही घाई वाटसरुंना खुळं करून टाकते. मी अनोळखी ठिकाणी बाय ऑल मिन्स रुट फिक्स केलेला असतो. पण कधीकधी स्थानिक मंडळींवर विश्वास टाकावा लागतो. टाकला आणि सिर्सी वरून सरळ भिवापूरला जाण्याऐवजी वर उमरेडला जावून पुन्हा खाली भिवापूरला आलो... मँपवर २० किलोमिटर जास्त भरलं तरी खराब रस्त्यामुळं ऐन दिवेलागणीच्या वेळचा फुल मोसममधला एक तास जास्त खाल्ला त्यानं. मग भिवापूरपासून गडचिरोलीपर्यंत धुराड्यात डोळ्यांची खाचाडं झाली.
- - - -
नद नद्या नाले झाडं झुडपं जनावरांना पोटात घालून खदखदा वाहिल्यानंतर गेल्या आठवडाभरात गडचिरोली शांत झालीये. पूर्वपदावर आलीये. कडक ऊन पडलंय आणि दुरुस्तीच्या रस्त्यांवर फुफाट्याचं साम्राज्य उधळतंय.
मावळतीनंतर काही क्षणात घनगर्द झालेल्या आभाळात चंद्र दोनचार चांदण्यांना हाताशी धरून गणाला उभा राहीला. अाज गणाला रणी आणिला.... पठ्ठेबापुराव सुरू झाले. मग हळू हळू एकेक तारा फेट्याचा तुरा सावरत गणात घसा खाकरू लागला. चांदण्या गवळणींची लगबग चाललेली. मथूरेच्या विमानांचा तप्पास नव्हता नभांगणात, पण गवळणी नटलेल्या नव्या नवरीसारख्या. वर हा सर्व साग्रसंगित सोहळा सुरू असताना खाली रस्त्याच्या दुतर्फा भात खाचरं कनातीच्या प्रकाशात प्रेक्षक म्हणून आपलं अस्तित्व दावत होती. वेडी पाखरं मध्येच एखादी शिळ घालायची अन् त्या शिळेवर एखादी अल्लड चांदणी गवळण जीव ओवाळून टाकायची... बुलेट धुडधुडत होती इनफिनिटीपर्यंत...

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...