Monday, January 1, 2018

शेतकरी मनिष शेळके - मेहकर, बुलडाणा

माजी जिल्हा परिषद सदस्य, खानावळ किंवा हॉटेल व्यवसायिक आणि चांगला शेतकरी म्हणून जेव्हा मनिष शेळके यांच्याशी परिचय झाला तेव्हा मी सगळ्या कसोट्या लावून मोकळा झालो. मला या मानसाचा प्रामाणिकपणा जास्त आवडला... जे आहे ते कोणताही आडपडदा न लावता स्पष्टपणे सांगतात... त्यांचा प्रवास भलताच रंजक आहे. 

शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. अनेकांनी ते अनेक प्रकारे केले आहे. नोकरदार शेतकरी, व्यवसायिक शेतकरी, राजकारणी शेतकरी, संडे फार्मर, नुसता शेतकरी वगैरे वगैरे वगैरे. या सर्वात राजकारणी शेतकरी आणि व्यवसायिक शेतकरी हे दोन केडर अनेकदा टिकाटिप्पणीचे आणि त्यातही हे लोक काय काळ्याचे पांढरे करायला शेती दाखवतात... अशा अर्थाचे शेरेबाजीग्रस्त असते. त्यामुळे मी शेळकेंच्या बाबतीत जास्तच चौकस होतो. पण जेवढा खोलात घुसत गेलो तेवढी त्यांची शेतीतली प्युरीटी स्पष्ट होत गेली आणि मग अॅग्रोटेक्निकल वेवलेंथ जुळायला अडचण आली नाही.

शेतीत भांडवलाशिवाय काही होत नाही. आणि ती जर खडकाळ पडीक असेल तर मग काहीच सोय नाही. शेळके कुटुंबाची वडिलोपार्जित फक्त एक एकर शेती होती. मनिष यांचे वडील सुखदेव शेळके हे शासकीय नोकरीत असल्याने सर्व कुटुंब नागपूरला स्थायिक झालेले. पण त्यांची शेतीची आवड शांत बसू देत नव्हती. मारवाड्याकडे भावकीची गहान पडलेली २५ एकर पडिक, नापिक जमिन १९९६ मध्ये विकत घेतली. अगदी पावसाळ्यातही ती पिकत नव्हती. हिवाळ्यात कॅनालच्या पाण्याने पानथळ असल्याने पिकत नव्हती.

मनिष यांचे शिक्षण नागपूर व पुण्याला झाले. त्यांनी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे. त्यानंतर ते हॉटेल व्यवसायात उतरले. मेहकरमध्ये खानावळीचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर हॉटेल सुरु केले. या व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी त्यातील उत्पन्न शेतीच्या सुधारणेसाठी खर्ची घालण्यास सुरवात केली. ब्लास्टिंग करुन खडक फोडला व या दगडांचा वापर करुन बांधबंदिस्ती केली. धरणातील गाळ आणून सहा फुट खोलीपर्यत गाळ भरुन जमिनी तयार केल्या.

दरम्यान, त्यांनी मेहकर परिसरात पडीक जमिनीत गुंतवणूक करणे सुरु ठेवले होते. अवघ्या 30 हजार रुपये एकर दराने एकर दोन एकर कोरडवाहू जमीनी घेत गेलो. मध्यंतरी कुटुंबाने घेतलेल्या २६ एकर जमिनीतील कॅनालला तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीत पाणी आले नाही. पानथळ जागा कोरडी झाली. याचा फायदा घेवून त्यांनी ही जमिन उपजावू करण्यासाठी कंबर कसली. त्यासाठी स्वतः गुंतवणूक केलेल्या जमिनींची विक्री केली. त्यातून मिळालेला सर्व परतावा हा त्यांनी कुटुंबाच्या जमिनीच्या विकसनासाठी खर्ची घातला.

यापैकी १६ एकर क्षेत्रात त्यांनी केळी लागवड केली असून या सर्व क्षेत्राला शेवरीचे कुंपन केले आहे. शेतातली ड्रेनेज सिस्टिम केली आहे. सर्व पाणी नदीच्या दिशेला वाहून जाते. निचरा सहज होतो. शेतातून गेलेल्या नाल्याला दोन्ही बाजूने दगडाचे पिचिंग केले आहे. शेतात 82 फुल खोल विहिर खोदलेली असून तिला 18 आडवे बोअर मारुन पाणी संकलित केले आहे. कर्ज काढून त्यांनी संपूर्ण शेतीचा स्वयंचलित सुक्ष्मसिंचन प्रकल्प उभारला आहे. पाण्याबरोबर खतेही या प्रकल्पातूनच दिली जातात. २७ महिन्यात केळीची तीन पिके घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे करण्यावर कटाक्ष ठेवल्याने फक्त साडेसहा महिन्यातच त्यांच्या केळीला घड लगडले आहेत. विक्रीचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. एप्रिलमध्ये १० एकरमध्ये १७ हजार रोपे, जुलै मध्ये तीन एकरमध्ये ४९०० रोपे तर सप्टेंबरमध्ये तीन एकर १५ गुंठ्यात ५५०० रोपे लावली आहेत. सर्व पिक जोमदार आलेले आहे. केळीशिवाय ते सहा एकर क्षेत्रावर हरभरा, सव्वा एकर गहू व अर्धा एकर कांदा बिजोत्पादन करत आहेत. केळी मध्ये आंतरपिक म्हणून त्यांनी लसून लावला आहे. यापुर्वी त्यांनी ११ एकरात घेतलेल्या सोयाबीनपासून फक्त 43 ते 48 हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. आता 16 एकर केळीतून सुमारे 48 लाख रुपये नफ्याचे त्यांचे गणित आहे.

मनिष यांनी वडिलांची आदर्श शेतीची इच्छा पूर्ण केली आहे. वडील मुख्य अभियंता म्हणून शासकीय सेवेतून निवृत्त झाले असून शेतीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी मदत करत आहेत. आई व पत्नीचीही त्यांना मोठी साथ आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेळके यांनी विविध व्यवसायांचा अवलंब करुन पाहिला. स्वयंपाकाची आवड असल्याने त्यातल्या त्यात हॉटेल व्यवसायाने त्यांना खुप चांगली साथ दिली. खानावळ चालवली. आता शेताजवळच नवीन हॉटेल सुरु करण्याचे त्यांचे नियोजन आहे. मध्यंतरी त्यांनी मित्रांच्या आग्रहास्तव राजकारणाचीही चव चाखली. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनिय काम केले. मात्र त्यांचा
शेतीतला रस पाहून खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांना राजकीय जबाबदारीतून मोकळे करुन शेतीकडे
लक्ष द्यायला सांगितले आणि तो निर्णय योग्य ठरला. 

No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...